मागील भागाचा थोडक्यात मागोवा
मागील लेखात आपण समजून घेतले की स्वभाव हा कायमस्वरूपी आणि न बदलणारा नसतो, तर अनुभव, वातावरण, शिकवण आणि विश्वास यांच्या आधारावर हळूहळू तयार होत जातो.
वृत्तींवर काम करून स्वभाव बदलता येतो, आणि त्यासाठी Unlearning ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे . कपाटातून जुने, न वापरले जाणारे कपडे काढल्याशिवाय नवीन कपड्यांना जागा मिळत नाही.
आज आपण पाहणार आहोत मनाचे ते कपाट कसे भरले आणि त्यात काही चुकीचे कपडे कसे शिरले.
आपण काय आणि का चुकीचे शिकतो हे समजणे का गरजेचे?
आपले विचार आणि वागणूक हे एकाएकी येत नाहीत.
ते आपल्या भोवतीच्या जगातून शिकलेले धडे असतात — काही योग्य, तर काही अपूर्ण किंवा दिशाहीन.
Unlearning करायची असेल तर आधी चुकीचे शिकलेले कुठून आले? हे समजणे आवश्यक आहे.
निदान नसेल तर उपचार कुठून सुरू करणार?
कुटुंबातून मिळालेले शिक्षण
घर आणि कुटुंबीय हे आपले पहिले शिक्षक असतात.
बोलण्याची पद्धत, स्वतःबद्दलचा दृष्टीकोन, भावना सांभाळण्याची किंवा दाबून ठेवण्याची शैली हे सगळे बालपणात आपण नकळत आपल्या कुटुंबियांकडून आत्मसात करतो.
अनेकदा घरात ऐकू येणारे शब्द किंवा दिसणारे दृश्य मनात खोलवर रुतून बसतात:
- “मोठ्यांना प्रश्न विचारू नयेत”
- “राग आवरला नाही तर तो व्यक्त करण्यापेक्षा आत ठेवणे बरे”
- “मुली मृदू आणि कोमल तर या उलट मुले कणखर असतात”
- “घरासाठी स्वतःचे विचार बाजूला ठेवणे हेच योग्य”
हे धडे कुणी औपचारिकपणे शिकवत नाही.
ते वर्तन, वाक्यरचना, नजरा आणि शांततेतूनही शिकले जातात.
समाज आणि “लोक काय म्हणतील” संस्कृती
कुटुंबानंतर समाज आपला दुसरा मोठा शिक्षक असतो.
शाळा, शेजार, समुदाय अशा प्रत्येक ठिकाणी काही न बोललेले/ अलिखित नियम असतात.
तिथून नकळत शिकलेल्या गोष्टी:
- “चूक मान्य केली तर कमीपणा येतो”
- “मदत मागणे म्हणजे कमजोर असणे”
- “इतरांपेक्षा वेगळे दिसणे टाळावे”
- “समोरच्याचा मान कायम ठेवणे सत्यापेक्षा अधिक महत्त्वाचे असते”
हे नियम तथ्य नसले तरी,
त्यांची वारंवार पुनरावृत्ती त्यांना सत्यासारखे भासवते.
अनुभव आणि त्यांचे चुकीचे अर्थ
छोट्या–मोठ्या अनुभवांचे मानसिक परिणाम दूरगामी असतात.
प्रत्येक अनुभव स्वतःसोबत एक संदेश घेऊन येतो, परंतु तो संदेश आपण योग्य प्रकारे समजतोच असे नाही.
काही धडे:
- एकदा लोक आपल्यावर हसले → “मी बोललो तर चुकतो”
- कोणी फसवले → “कोणीही विश्वासार्ह नसते”
- सतत कौतुक मिळाले → “मी नेहमी परिपूर्ण असलेच पाहिजे”
अनुभव खरे असतात पण त्यातून आपण काढलेला निष्कर्ष मात्र अपूर्ण किंवा चुकीचा असू शकतो.
भावनिक जखमा आणि बचाव करणारे विश्वास
काही विश्वास “चुकीचे” वाटले तरी ते आपल्याला वाचवण्यासाठी तयार झालेले असतात.
उदाहरणार्थ:
- “मीच कमी आहे” → कमी अपेक्षा ठेवून निराशा टाळणे
- “लोकांवर विश्वास ठेवू नये” → भावनिक दुखापत टाळणे
- “मी भावना व्यक्त केल्या तर प्रेम मिळणार नाही” → नकाराची भीती
हे विश्वास काही काळासाठी रक्षण करतात, पण दीर्घकालीन नुकसान घडवून आणतात. आपल्या दैनंदिन जीवनात हेच विचार आपल्या नात्यांच्या आणि प्रगतीच्या आड येणाऱ्या सीमारेषा बनतात.
आजच्या काळातील तुलना आणि ताण
डिजिटल युगातील दबाव आणखी एक शिकवण देतो.
सोशल मीडियावर दिसणारे “इतरांचे आयुष्य” वास्तव नसते,
पण त्याच्याशी तुलना करून आपण स्वतःची किंमत ठरवत असतो.
या प्रक्रियेत आपण नकळत शिकतो:
- “मी पुरेसा नाही”
- “मी मागे आहे”
- “त्यांच्याकडे जास्त आहे, माझ्याकडे कमी”
अशी शिकवण बाह्यरूपावर आधारित असून
आपल्या मानसिक शांतीला घातक ठरते.
थोडक्यात — आपण चुकीचे का शिकतो?
सारांश:
- बालपणात विचार करण्याऐवजी अनुसरण करणे
- समाजाचे अदृश्य नियम न प्रश्न करता स्वीकारणे
- अनुभवांचे अपूर्ण अथवा नकारात्मक अर्थ काढणे
- भावनिक वेदनेपासून वाचण्यासाठी मनाचे संरक्षण करणारे विचार दृढ करणे
- सतत तुलना आणि बाह्य अपेक्षा यांच्या डोहात अडकणे
हे सगळे मिळून आपल्यामध्ये
मर्यादा, अडथळे आणि चुकीच्या श्रद्धा/ धारणा निर्माण करतात.
आपल्या याच गोष्टी ओळखणे म्हणजे Unlearning ची पहिली पायरी आहे.
पुढील लेखात आपण पाहू —
ही चुकीची शिकवण प्रत्यक्ष आयुष्यात कशी त्रास देते?
नात्यांमध्ये, निर्णयांमध्ये, आणि आत्मप्रतिमेमध्ये ती कोणते अडथळे निर्माण करते?



