बुवाबाजी आणि मानसशास्त्र

Table of Contents

अलीकडेच पुण्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सर्वांचे लक्ष वेधले — एका तथाकथित ‘बुवाने’ पत्रिकेत दोष आहे तो दूर करण्यासाठी आणि सर्व सुरळीत करण्यासाठी तब्बल १४ कोटी रुपयांची संपत्ती विकून देण्यास प्रवृत्त केले, आणि पैसे निकटवर्तीयांच्या खात्यात ट्रान्स्फर होताच पोबारा केला. ही घटना केवळ आर्थिक फसवणूक नव्हे, तर मानसिक आणि भावनिक शोषणाचे भयावह उदाहरण आहे.सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या प्रकरणातील बळी हे शिक्षित, सुस्थित आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम लोक होते.
अशा घटना आज अपवाद राहिलेल्या नाहीत. बुवा, गुरू, साधक, ऊर्जावान मार्गदर्शक या नावांनी अनेक ठिकाणी लोकांच्या श्रद्धेचा, भीतीचा आणि असुरक्षिततेचा फायदा घेतला जातो. या लेखाचा उद्देश श्रद्धेला विरोध करणे नाही, तर श्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या मानसिक शोषणाच्या प्रक्रियेचे मानसशास्त्रीय विश्लेषण करणे हा आहे.

श्रद्धा आणि बुवाबाजी – दोन वेगळे स्तर

श्रद्धा ही मानवी मनाची नैसर्गिक गरज आहे. ती मनाला स्थैर्य देते, आशा निर्माण करते आणि जीवनाला अर्थ देते. परंतु जेव्हा ही श्रद्धा अंधस्वीकृती, प्रश्नविरहीत अवलंबित्व आणि भीतीवर आधारित होते, तेव्हा तीच बुवाबाजीसाठी सुपीक जमीन ठरते.
बुवा श्रद्धेला आपल्यासाठी साधन बनवतात. ते म्हणतात — “देव माझ्यातून बोलतो”, “तुमच्या जीवनातील सर्व प्रश्न मी सोडवेन”, “शंका घेऊ नका – हेच दैवी आदेश आहेत.” अशा वाक्यांमुळे व्यक्ती स्वतःच्या विचारक्षमतेवर पडदा टाकते आणि बुवावर पूर्ण अवलंबून राहते. श्रद्धेचा उद्देश मन:शांती असावा, पण बुवाबाजी श्रद्धेला भीती आणि नियंत्रणाचे हत्यार बनवते.

मानवी मन आणि ‘सुरक्षेची भूक’

मानसशास्त्रानुसार प्रत्येक मनुष्याला तीन मूलभूत मानसिक गरजा असतात — सुरक्षितता, स्वीकृती आणि नियंत्रणाची भावना.
जेव्हा आयुष्यात अस्थिरता येते — जसे की आजार, आर्थिक अडचण, नात्यांमधील तणाव — तेव्हा मनुष्य कोणीतरी मजबूत, ठाम, “सर्व उत्तरं देणारी” व्यक्ती शोधतो.
बुवा हेच वचन देतात — “तुमची जबाबदारी मी घेतो, तुम्ही फक्त विश्वास ठेवा.”
या वाक्यातून व्यक्तीला अल्पकाळासाठी समाधान आणि सुरक्षिततेचा भास होतो, पण प्रत्यक्षात ती स्वायत्ततेपासून दूर जाते.
डॉ. अब्राहम मॅस्लो यांच्या “हायरार्की ऑफ नीड्स”नुसार, असुरक्षिततेच्या काळात मनुष्य आध्यात्मिक आश्रय शोधतो. बुवाबाजी त्याच मानसिक टप्प्याचा गैरफायदा घेते — भीतीला श्रद्धेत रूपांतरित करून ती भावनिक गुलामीत परिवर्तित करते.

शिक्षित लोक का अडकतात?

शिक्षण माहिती देते, पण मानसिक सक्षमता (Psychological Immunity) देत नाही. आपली शिक्षणपद्धती ज्ञानकेंद्रित आहे; ती स्वत:च्या भावनांचे निरीक्षण, तर्कशक्तीचा वापर आणि शंका विचारण्याची क्षमता फारसे शिकवत नाही.
जेव्हा शिक्षित व्यक्ती आयुष्यातील संकटांमुळे मानसिकदृष्ट्या कमकुवत होते, तेव्हा तिची तर्कशक्ती तात्पुरती दुर्बल होते. अशावेळी बुवाचे आत्मविश्वासपूर्ण बोलणे, “दैवी भाषा”, आणि गूढ वातावरण तिला प्रभावित करते. तो “देवाचा प्रतिनिधी” असल्याचा दावा करताच, व्यक्तीच्या मनात आदरासोबत भय निर्माण होते — “जर मी याला न मानले, तर काही अनर्थ होईल का?” हीच भीती बुवाबाजीचे मुख्य मानसशास्त्रीय शस्त्र आहे.

‘भीती आणि अपराधीपणा’ – नियंत्रणाचे दोन धागे

बुवाबाजी करणारे दोन प्रमुख मानसिक तंत्र वापरतात – भीती आणि अपराधभाव.
ते सांगतात – “तू माझा सल्ला पाळला नाहीस म्हणून तुझ्यावर संकट आले”, किंवा “देव रागावला आहे.”
यामुळे व्यक्ती स्वतःला दोषी समजते आणि बुवाच्या शब्दांवर आणखी विश्वास ठेवते.
फ्रॉईड यांच्या मतानुसार, अपराधभाव ही सर्वात प्रभावी नियंत्रणाची पद्धत आहे – कारण ती मनुष्याला स्वतःच्या विरोधात वागण्यास भाग पाडते.
काही प्रकरणांत बुवा सांगतात – “तू माझ्या सेवेत राहिलास तर तुझ्या सात पिढ्या उन्नत होतील.” अशा आश्वासनांनी व्यक्तीचा आत्मसन्मान बुवाच्या नियंत्रणात जातो. श्रद्धा तेथे संपते आणि गुलामी सुरू होते.

‘कॅरिझ्मा’चे मानसशास्त्र – बुवाचे प्रभावी व्यक्तिमत्त्व

बुवा हे केवळ धार्मिक व्यक्ती नसतात; ते अत्यंत प्रभावी मानसशास्त्रीय वाचक असतात.
ते लोकांच्या भावनिक कमकुवती वाचतात — कोणाला भय आहे, कोणाला मान्यता हवी आहे, कोण निराश आहे — आणि त्याच बिंदूंवर ते विश्वास निर्माण करतात. मानसशास्त्रज्ञ मॅक्स वेबर यांनी याला “Charismatic Authority” असे म्हटले आहे. अशा व्यक्ती आपला आवाज, शरीरभाषा, धार्मिक प्रतीके, आणि कथित “दैवी अनुभव” वापरून अनुयायांच्या मनावर प्रभाव टाकतात. हा प्रभाव एकदा निर्माण झाला की अनुयायी बुवावर प्रश्न विचारण्याचे धैर्य गमावतो — कारण त्याला वाटते की प्रश्न विचारणे म्हणजे “देवावर शंका घेणे”.

‘प्लेसिबो इफेक्ट’ आणि अनुभवाचा भ्रम

काही लोक सांगतात की “बुवाच्या आशीर्वादाने माझे काम झाले”, “त्याने दिलेला ताईत लावल्यावर माझा आजार बरा झाला.” मानसशास्त्रात हे प्लेसिबो इफेक्टचे उदाहरण आहे — म्हणजेच उपचाराची खरी परिणामकारकता नसून, “मला फायदा होईल” या विश्वासामुळे मन शरीरावर सकारात्मक परिणाम घडवते. या परिणामामुळे बुवाला “अलौकिक शक्ती” असल्याचा विश्वास अधिक घट्ट होतो. परंतु दीर्घकाळ हा विश्वास व्यक्तीला तर्कशक्तीपासून दूर नेतो आणि वास्तवातील उपाय शोधण्याची क्षमता कमी करतो.

सामाजिक गट आणि ‘समूह मानसिकता’

बुवाबाजी केवळ वैयक्तिक नाही; ती समूह मानसिकतेतून वाढते. जेव्हा मोठा गट एखाद्या बुवाच्या मागे उभा राहतो, तेव्हा नवीन सदस्य त्याला “सत्य” समजतो. इर्विंग जॅनिस यांच्या Groupthink Theoryनुसार, गटात एकसारखा विचार राखण्यासाठी सदस्य स्वतंत्र विचार सोडतात. “सगळे मानतात, म्हणजे ते खरेच असेल” — ही भावना बुवाबाजीला पोषण देते. या गटात विरोध करणाऱ्यांना “अश्रद्ध”, “पापी” किंवा “देवद्रोही” म्हणत समाजातून वेगळे केले जाते. परिणामी, व्यक्ती गप्प बसते आणि बुवाचा प्रभाव वाढतो.

असुरक्षिततेचा बाजार – मानसशास्त्रीय फसवणुकीचे सूत्र

बुवाबाजी म्हणजे प्रत्यक्षात भीतीचा व्यवसाय. लोकांच्या असुरक्षिततेचा फायदा घेत “शांती, आरोग्य, पैसा, नशीब, परतलेले नातं” यांची हमी देणारे अनेक तथाकथित गुरू मानसिक फसवणुकीचे जाळे पसरवतात. हे गुरू माणसाला त्याच्या “कमजोरी”ची आठवण करून देतात आणि मग तिच्या बदल्यात उपाय विकतात. हेच बुवाबाजीचे मानसशास्त्रीय मॉडेल आहे — “समस्या निर्माण करा, भीती वाढवा, आणि उपाय विक्री करा.”

परिणाम – मनोविकार, आर्थिक आणि कौटुंबिक नुकसान

  • बुवाबाजीचे परिणाम केवळ आर्थिक नाहीत; ते खोल मानसिक जखमा सोडतात:
  • आत्मविश्वासाचा ऱ्हास: प्रत्येक निर्णयासाठी बुवावर अवलंबित्व वाढते.
  • गिल्ट, अपराधभाव आणि भीती: स्वतःचे विचार “पापी” वाटू लागतात.
  • कौटुंबिक तणाव: कुटुंबातील मतभेद वाढतात, कारण काहीजण तर्क मांडतात तर काहीजण श्रद्धा जपतात.
  • सामाजिक अलगाव: बुवाच्या गटाबाहेरचे लोक “अविश्वासू” समजले जातात.
  • ही सर्व लक्षणे हळूहळू मानसिक गुलामीचे स्वरूप धारण करतात.

बुवाबाजीविरोधी मानसिक सक्षमीकरण

या समस्येवर उपाय केवळ कायद्याने होत नाहीत; मानसिक शिक्षण आणि जागरूकता आवश्यक आहे.

  • तर्कशील श्रद्धा: श्रद्धा आणि प्रश्न विचारणे हे एकमेकांचे शत्रू नाहीत. तर्कयुक्त श्रद्धा म्हणजे मन आणि बुद्धीचा समतोल.
  • भावनिक साक्षरता: लोकांनी आपल्या भावना, भीती आणि अपेक्षा ओळखायला शिकले पाहिजे. “मला का वाटते की कोणी तरी माझी काळजी घ्यावी?” – हा प्रश्न स्वतःला विचारणे गरजेचे आहे.
  • वैज्ञानिक दृष्टिकोन: शाळा, माध्यमे आणि धार्मिक संस्था यांनी एकत्र येऊन विज्ञानाधारित विचार मांडावेत.
  • समुपदेशन आणि मानसोपचार: जे लोक बुवाबाजीच्या अनुभवातून आले आहेत, त्यांना दोषी नव्हे तर पीडित म्हणून बघणे आवश्यक आहे. त्यांच्या आत्मविश्वासाची पुनर्बांधणी मानसोपचाराद्वारे करता येऊ शकते.
  • माध्यमांची जबाबदारी: बुवांचे अंधानुकरण वाढवणाऱ्या जाहिराती आणि कार्यक्रमांना मर्यादा घालाव्यात.

बुवाबाजी हा श्रद्धेचा शत्रूच नाही, तर तिचा विकृत अवतार आहे. श्रद्धा मनाला उभारी देते, तर बुवाबाजी मनाला गुलाम बनवते.आज पुण्यातील १४ कोटींच्या घटनेप्रमाणे कित्येक लोक भावनिक शोषणाचे बळी ठरतात — कारण त्यांना श्रद्धा हवी असते, पण तीच श्रद्धा भीती, अपराधभाव आणि असुरक्षिततेच्या जाळ्यात अडकते.

मानसशास्त्र आपल्याला शिकवते की खरा अध्यात्मिक विकास म्हणजे स्वत:ची जाणीव वाढवणे, दुसऱ्याच्या अधीन जाणे नव्हे. जोपर्यंत समाज स्वतःच्या भावनांचे आणि श्रद्धेचे मानसशास्त्र समजून घेत नाही, तोपर्यंत बुवाबाजी वाढत राहील. परंतु ज्या क्षणी माणूस म्हणतो — “माझ्या श्रद्धेला तर्काची साथ आणि माझ्या विश्वासाला जबाबदारीची जोड हवी,” त्या क्षणी बुवाबाजीचा अंधार कमी होतो आणि आत्मजाणिवेचा प्रकाश निर्माण होतो.

आज पुण्यातील १४ कोटींच्या घटनेप्रमाणे कित्येक लोक भावनिक शोषणाचे बळी ठरतात — कारण त्यांना श्रद्धा हवी असते, पण तीच श्रद्धा भीती, अपराधभाव आणि असुरक्षिततेच्या जाळ्यात अडकते.

मानसशास्त्र आपल्याला शिकवते की खरा अध्यात्मिक विकास म्हणजे स्वत:ची जाणीव वाढवणे, दुसऱ्याच्या अधीन जाणे नव्हे. जोपर्यंत समाज स्वतःच्या भावनांचे आणि श्रद्धेचे मानसशास्त्र समजून घेत नाही, तोपर्यंत बुवाबाजी वाढत राहील. परंतु ज्या क्षणी माणूस म्हणतो —“माझ्या श्रद्धेला तर्काची साथ आणि माझ्या विश्वासाला जबाबदारीची जोड हवी,”त्या क्षणी बुवाबाजीचा अंधार कमी होतो आणि आत्मजाणिवेचा प्रकाश निर्माण होतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Read also

लोकशाही, मानसिक आरोग्य आणि मतदान

उद्या म्हणजेच 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुका होत आहेत. मूलभूत सुविधा, शहराचा विकास, सार्वजनिक व्यवस्था, शिक्षण आणि सुरक्षितता या सर्व निर्णयांचे केंद्रबिंदू नगरपालिका असते.

Read More »
स्वातंत्र्य म्हणजे मर्यादांचा अभाव नव्हे

लक्ष्मणाने सीतेसाठी आखलेली रेषा ही बंधन नव्हती, तर सुरक्षिततेसाठीची एक स्पष्ट सीमा होती. त्या रेषेचा उद्देश सीतेला रोखणे नसून तिला वाचवणे हा होता. रावणाने संरक्षक

Read More »
Scroll to Top

Get updates on whatsapp

"*" indicates required fields

Name*
Receive Updates about*