वैयक्तिक आयुष्यात मतभेद समोरासमोर होतात. समोरची व्यक्ती दिसते, तिचा आवाज, हावभाव आपल्याला जाणवतात. पण सोशल विरोध अनेकदा अचानक, सार्वजनिक आणि टोकाच्या शब्दांच्या स्वरूपात येतो. यामुळेच सोशल मिडियावरील विरोधी प्रतिक्रिया मानसिकदृष्ट्या अधिक अस्वस्थ करणाऱ्या ठरतात.
सोशल मिडियावर नेमके काय घडते?
मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर सोशल मिडिया हे भावनिक ट्रिगर अधिक वेगाने सक्रिय करणारे माध्यम आहे
- विरोध करताना समोरील व्यक्ती दिसत नसल्याने सहानुभूतीची भावना आपोआप कमी होते, विरोध करताना चेहरा आणि ओळख सर्वांसमोर खुली होत नाही, त्यामुळे लोक प्रत्यक्षात न बोलू शकणारे शब्द देखील खूप सहज ऑनलाइन बोलून जातात.
- आपल्या पोस्ट वर आलेली प्रतिक्रिया ही केवळ आपल्यासाठी रहात नाही तर ती सार्वजनिक होते, त्यामुळे आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला धोका असल्याची जाणीव मेंदूत निर्माण होते.
- माझ्या विचारांवर टीका म्हणजे माझ्यावरच टीका असा एक विचार आपल्याला येतो आणि त्यातून आपला अहंकार दुखावतो.
- अल्गोरिदम मुळे भावनिक आणि वादग्रस्त प्रतिक्रिया आपल्याला जास्त प्रमाणात दिसतात, त्यामुळे नकारात्मकता जास्त असल्याचा भास निर्माण होतो.
भावनिक स्थैर्यासाठी सोशल मिडिया वापराच्या काही पायऱ्या
पायरी 1️⃣ : लगेच उत्तर देऊ नका
विरोधी कमेंट वाचताच उत्तर टाइप करू नका.
ऑनलाईन वातावरणात भावनिक प्रतिक्रिया अधिक वेगाने बिघडते.
किमान काही मिनिटांचा विराम घ्या.
हे इम्पल्स कंट्रोलसाठी अत्यावश्यक आहे
पायरी 2️⃣ : प्रतिक्रिया कोणत्या प्रकारची आहे ते ओळखा
सर्व विरोध समान नसतो.
प्रश्नात्मक / वैचारिक विरोध – उत्तर देण्यासारखा
गैरसमजावर आधारित विरोध – स्पष्टता देण्यासारखा
उपरोधिक / अपमानास्पद विरोध – दुर्लक्ष करण्यासारखा
प्रत्येक कमेंटला उत्तर देणे ही मानसिक गरज नाही, विरोधाधी पद्धत समजून मग व्यक्त होणे आवश्यक ठरते.
पायरी 3️⃣: स्वतःला हा प्रश्न विचारा – “माझा उद्देश काय?”
मला समजावून सांगायचे आहे का?
चर्चा करायची आहे का?
की फक्त स्वतःचा राग उतरवायचा आहे?
जर उद्देश स्पष्ट नसेल, तर उत्तर देणे टाळलेलेच बरे.
पायरी 4️⃣: उत्तर द्यायचेच असेल तर ‘माहिती’ ठेवा, ‘भावना’ नाही
सोशल मिडियावर भावनिक उत्तर म्हणजे इंधन ओतल्यासारखे असते.
उत्तर द्यायचे असल्यास ते थोडक्यात, तथ्याधारित आणि शांत भाषेत असावे.
“तुमच्या मताबद्दल धन्यवाद, माझा दृष्टिकोन असा आहे…”
अशी भाषा संघर्ष कमी करते.
पायरी 5️⃣ : सर्वांना समजावून सांगण्याची जबाबदारी स्वतःवर घेऊ नका
मानसशास्त्र स्पष्ट सांगते की
काही लोक समजून घेण्यासाठी नाही तर उत्तेजना मिळवण्यासाठी प्रतिक्रिया देतात.
अशा वेळी संवाद थांबवणे हे पराभव नसून मानसिक शहाणपण आहे.
पायरी 6️⃣ : डिजिटल मर्यादा ठरवा
सतत कमेंट्स वाचत बसू नका
गरज असल्यास mute / block / restrict वापरा
ही साधने दुर्बलतेसाठी नसून मानसिक आरोग्य संरक्षणासाठी आहेत.
पायरी 7️⃣ : स्वतःवर परिणाम होत असल्याची लक्षणे ओळखा
जर
चिडचिड वाढत असेल
झोपेवर परिणाम होत असेल
सतत तीच कमेंट डोक्यात घोळत असेल
तर थोडा डिजिटल ब्रेक घेणे आवश्यक आहे.
हे स्व-देखभालीचे लक्षण मानले जाते, पलायनाचे नाही.
सोशल मिडियावरचा विरोध हा बहुतेक वेळा
आपल्या विचारांपेक्षा समोरच्याच्या भावनिक अवस्थेबद्दल अधिक सांगत असतो.
प्रत्येक कमेंटला उत्तर देणे ही परिपक्वता नाही,
आणि शांत राहणे ही कमजोरी नाही.
ऑनलाईन जगात स्वतःची मानसिक शांती जपणे
हेच खरे यश मानले पाहिजे.



